वसुंधरेच्या शालूचा उडाला रंग हिरवा, सिमेंटच्या काटयांनी तो किती जागी फाटावा? सुधारणा आणि आधुनिकतेच्या नावाखाली, आता का तिनेही मिनीस्कर्ट घालावा? नेत्रांना सुखावणारे तिचे रूप, आता आग ओकताना दिसते; हिरवाईने झाकणारी छाया आता, तप्त ज्वाळानी भाजते. शुद्ध हवा नाहीशीच झाली, प्रदूषणाने जीवाची घालमेल वाढली; तापमानाच्या वाढीने सोसेना काहिली, कारण फ़क्त एकच — माणूस, ज्याने माता आणि पर्यावरणाची आब नाही राखली.
बेसुमार वृक्षतोड ठायी ठायी केली, पण झाडे लावण्याची गरज नाही जाणली; वृक्ष आपले मित्र हेच तो विसरला, अन् झाडे लावण्यापेक्षा कापण्यातच सुखावला. पण सारं काही यंत्रानीच साध्य होणार नाही, निसर्गाला अवहेलून पुढे जाता येणार नाही. झाडे लावा, झाडे जगवा — आज याची खरी गरज आहे; कारण वसुंधरेच्या शालूतच, झाकलेली मानवा तुझी लाज आहे.